Thursday, March 3, 2016

धागा धागा अखंड विणूया:

धागा धागा अखंड विणूया:
हिरेन कपाडिया हा माझा इंजिनियरिंग कॉलेज मधला मित्र. मुळचा राजकोटचा, १२वी मुंबईतून करून मग इंजिनियरिंग साठी पुण्यात आला. ग्रॅज्युएशन झाल्यावर काही काळ मुंबई मध्ये व्यवसाय करून मग राजकोट मध्ये जाऊन स्थिरावला. इंजिनियरिंग करत असताना मनीषाच्या प्रेमात पडला. त्यांचा आमच्या दृष्टीने फेअर असलेलं अफेअर २ वर्ष चाललं आणि त्याचं विवाहात रुपांतर झाल. त्यानंतर म्हणजे आता २० वर्षे त्याची भेट झाली नाही. नुकतंच फेसबुक ने आमची पुन्हा भेट घडवून आणली आणि त्याची पुन्हा नव्याने ओळख झाली! योगायोगाने कामानिमित्त राजकोटला जायची संधी अगदी लगेच आली आणि मी त्याला त्याविषयी सांगितले. अनेक वर्षानी भेट होण्याचा योग असा अगदी जुळून आला. राजकोटला गेल्यावर संध्याकाळी जेवायचं निमंत्रणही मी मानिषभाभींकडून पदरात पडून घेतलं ( तसं कोणी ‘आग्रहानं’ बोलावलं तर उगाच नको नको म्हणणं वाईट दिसत ना, म्हणून) आणि राजकोटला पोचल्यावर एका संध्याकाळी त्याच्या घरी दाखल झालो.
प्रशस्त बंगला, दारी गजांतलक्ष्मीचं आधुनिक रूप असलेली इम्पोर्टेड गाडी, मोठा दिवाणखाना आणि विविध सजावटीच्या वस्तूंनी नटलेली शोकेस यावरून त्याच बहरलेल कर्तुत्व दिसून येत होत. हिरेन आणि मनीषाभाभींनी माझं स्वागत केल. वयानुसार थोडे पांढरे झालेले केस आणि लागलेला चष्मा या व्यतिरिक्त हिरेनमध्ये काहीही बदल झालेला नव्हता. नाही म्हणायला काळ्या पडलेल्या दातांवरून मावा खाण्याची सवय त्याला जडलेली दिसत होती. अनेक वर्षानी भेटल्यावर आम्हाला स्वाभाविक आनंद झाला. हिरेन मुंबई- पुण्याकडे शिकल्यामुळे आणि भाभी पुण्याच्याच असल्यामुळे आमचे बरेचसे संभाषण पुण्याभोवती आणि मराठीतूनच सुरु झाले. त्याची दोन चुणचुणीत मुले ‘हेलो अंकल’ म्हणून नमस्कार करून जेवायला आमच्याबरोबर येऊन बसली. कॉलेजमधील आठवणींपासून ते राजकारणापर्यंत सर्व विषयावरील गप्पांमध्ये खास सौराष्ट्रातील पदार्थांनी नटलेल ताट केव्हाच संपून गेलं.
जेवणानंतर आम्ही दिवाणखान्यात जाऊन बसलो. गप्पांच्या शेवटच्या चरणात थोडा वेळ जाणार म्हणून कॉफी आली. बहुतेक सर्व आठवणी उजळून झाल्याच होत्या त्यामुळे संभाषणाच्या मध्ये थोडी गॅप पडली होती. ‘रितेश भेटला होता कारे एव्हढ्यात?’ मी त्याला विचारलं. ‘कोण रितेश गांधी?’ हिरेनने प्रतिप्रश्न केला. पण हा प्रश्न विचारताना त्याच्या चेहऱ्यावर तिरस्काराची रेष स्पष्टपणे उठलेली मला दिसली. कॉफी ढवळताना भाभींचा हात थोडा वेळ थांबलाय हे मला जाणवलं. ‘काही तरी गडबड दिसते आहे, उगाच मिठाचा खडा पडावा तसा हा प्रश्न विचारला’ माझ्या मनात आल. ‘हो रितेश गांधी’ मी पडेल आवाजात उत्तर दिल, अजिबात भेटला नाहीये हे उत्तर ऐकण्याची मानसिक तयारी करून.
रितेश गांधी आमचा आणखीन एक मित्र. तो मुंबई चा होता आणि गुजराती असल्यामुळे त्याच आणि हिरेनच चांगल जमत असे. इंजिनियरिंगच शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघांनी मुंबईत राहून काही व्यवसाय सुरु केल्याच आम्हाला माहित होत. पण पुढे काय झाल या विषयी काहीच माहित नव्हती. तस त्याची भेट सुद्धा फेसबुक माध्यमातून नुकतीच दोन वर्षापूर्वी पुन्हा झाली होती. सध्या मात्र आम्ही दोघ महिन्यातून एकदा भेटत होतो.
हिरेन ने एक दीर्घ श्वास घेतला. ‘ नाही भेटला बर्याच वर्षात....तुला आठवतंय, इन्जीनीयरिंग नंतर आम्ही एकत्र व्यवसाय सुरु केला होता.’ हिरेन सांगू लागला. त्यांचा व्यवसाय चांगला चालू झाला, एक दोन वर्षात त्यांनी चांगला जम बसवला. पण मग कुरबुरींना सुरुवात झाली. सुरु झाल्यापासून चार वर्षांनी अखेरीस त्यानी वेगळ होण्याचा निर्णय घेतला. या चार वर्षातील बर्याचशा वाईट अनुभवांचा तपशीलवार इतिहास हिरेनने मला सांगितला. ‘तू आम्हाला दोघांना ओळखतोस म्हणून तुला सर्व सांगितल. नाही तर इतक खोलात मनीषा शिवाय कोणालाच माहित नाहीये.’ हिरेन ने खुलासा केला. ‘अर्थात जे घडल त्यात रितेशची फारशी चूक नव्हतीच असही मला वाटतंय, पण जाऊदे झाल ते झाल, आता वाटून काय उपयोग ?’ हिरेन खिन्नपणे म्हणाला. त्याच्या कथनात फार जास्त नकारात्मकता होती आणि मला त्यातल काहीच घ्यायचं नव्हत. त्यामुळे मी ‘ अस!, जाऊदे रे’ या पलीकडे काहीच बोललो नव्हतो. पण त्याच कथानक संपल्यावर मी ठरवून एक खबरदारी घेतली. त्यान आजवर बाळगलेल हे नकारात्मक गोष्टींच गाठोडं पुन्हा वळण्यापासून त्याला परावृत्त केल. डोक्यावरच मोठ्ठ ओझं उतरल्यामुळे हिरेन जरा मोकळा झाल्यासारखा वाटला.
‘तू भेटलास रितेश ला एव्हढ्यात? ‘ हिरेनन मला विचारलं. ‘ हो, रितेश आता पुण्यात असतो. ट्रेडिंग करतो. आम्ही भेटतो महिन्यातून एकदा. गेल्याच महिन्यात तो तुझी आठवण काढत होता’ शेवटच वाक्य धादांत खोट आहे हे माहित असूनही मी बोलून गेलो, मुद्दामहून. ‘त्याचा फोन नंबर देशील?’ हिरेन ने प्रश्न केला. मी त्याला फोन नंबर दिला. थोड्या वेळाने दोघांचा निरोप घेतला, पुण्याला घरी यायचं निमंत्रण दिल आणि त्याच्या घरातून बाहेर पडलो.
दुसर्या दिवशी पुण्यात पोचल्यावर ठरवून रितेश ला फोन केला. ‘ हिरेनच्या घरी जाऊन आलो. तो तुझी आठवण काढत होता.’ दुसरा धादांत खोट वाक्य. पण रितेशचा स्वर या वाक्यानंतर आनंदलेला वाटला.
बरोबर एका आठवड्याने संध्याकाळी हिरेनचा फोन आला. आपला खोटेपणा उघडकीस येणार का काय अशी शंकेची पाल चुकचुकली. फोन उचलला. पलीकडून हिरेनचा आनंदित आवाज आला. ‘ गेस, आज कोण माझ्या घरी आलंय?’ मी निशब्द झालो. ‘ रितेश......थॅंक यू, तुझ्यामुळे आम्ही आज परत भेटतोय’ माझा माझ्या कानांवर विश्वास बसला नाही. माला जसा हव तस घडल. माझी दोन वाक्य या दोघांना परत जोडून आणण्यात यशस्वी ठरली होती. हिरेन आणि रितेश च्या मैत्रीतील काही धागे उसवले होते ते पुन्हा शिवण्यात मला यश आल होत. अशी अनेक नाती जोडणारे, मनाला झालेल्या भळभळणार्या जखमा हळुवार शिवणारे, टाके घालणारे काही लोक माझ्या आयुष्यात आले, मी त्यांना जवळून बघितलं हे माझ सौभाग्य, त्यातूनच मला नकळत ही प्रेरणा मिळाली आणि एक तरी तुटलेला दुवा पुन्हा जोडू शकलो म्हणून मला अतिशय आनंद झाला.

टी.व्ही. वर त्याच वेळेस जाट आंदोलनात होरपळून गेलेल्या हरियाणातल्या बातम्या दाखवत होते. त्या बघता बघता मला झालेला आनंद पार गळून पडला आणि त्याची जागा विषण्णतेनी घेतली. विविध समाजानी अरक्षणासाठी केलेली आंदोलने, नव्याने उफाळून आलेले सामाजिक वाद यांच्या बातम्यांनी मन व्यथित होतच. स्वार्थी राजकारण आणि संकुचित मानसिकतेतून व्यक्त होणारा अभिनिवेश आणि त्यातून होणारा असा निष्फळ वांशिक संघर्ष हा आपल्या एकसंध समाजाची लक्तरं करतोय. विविधतेन नटलेल्या समाजाला एकात्म बनवण्यासाठी संत महंत आणि देशभक्तांनी अथक प्रयत्न केले आणि प्रसंगी बलिदानही दिल. त्या सर्वांच्या प्रयत्ना विरुद्ध दुफळीची बीजे पेरून समाजाची घट्ट असलेली विण उसवू पाहणारी नतद्रष्ट लोकांची पलटणच कार्यरत झालेली दिसून येते. त्यांचे दुष्ट हेतू उधळून टाकायला हवेत. सौहार्दाचे उसवलेले टाके पुन्हा घालायला हवेत. प्रादेशिक अस्मिता असावी पण ती आपल्याच मुळावर येत नाही ना ही जाणीवही ठेवायला हवी. ज्यांना याची जाणीव आहे त्या प्रत्येक देशभक्त नागरिकाने यासाठी जागरूक राहायला हवे. एकसंध आणि एकात्म समाजाच्या निर्मितीसाठी धागा धागा विणत रहायला हवे.  

Friday, February 19, 2016

स्मशानयोगी!

स्मशानयोगी!
बर्याच दिवसांनी भेटलेल्या परिचिताशी संभाषण करताना ‘काय कसं काय बरंय ना?’ हा किंवा ‘काय म्हणता? हा प्रश्न नेहमीच सुरुवात म्हणून वापरला जातो. सामान्यपणे याचे अपेक्षित उत्तर हे ‘मजेत आहे’ किंवा ‘ चांगल चाललंय’ , समोरचा अगदी दुखाःत असेल तरी ‘ चाललय बघा’ इतकंच गुळमुळीत असतं. किंबहुना लोक-रीत म्हणून आपण तस शिकलोय. या प्रश्नाला कोणी नाही, फार वाईट चाललय असा उत्तर दिल्याचं माझ्या ऐकिवात नाही. उगाच आपल्या व्यथेची वाच्यता नको असा विचार या मागे असावा बहुतेक. काही जण खडूसपणे समोरच्याची बोळवण करण्यासाठीही हा प्रश्न सर्रास वापरतात असाही अनुभव येतो. एरवी ठीक आहे, पण हा प्रश्न जेंव्हा वैकुंठ स्मशान भूमीत मला ऐकू आला आणि त्याचे आनंदात आहे हे उत्तर जेंव्हा ऐकले तेंव्हा मात्र कान टवकारले गेले. जिथे कायम दुखाची छाया असते असा आपला समज असतो तिथे आनंदात असणारा हा माणूस कोण आहे हे कुतूहल त्यामागे होत.
एका परिचितांच्या अंत्यविधीसाठी तिथे गेलो होतो. वेळ होता म्हणून पारावर बसलो होतो. सकाळची प्रसन्न वेळ खरी पण तिथलं वातावरण उदास होत. अश्रू ढाळत येणारे मृतांचे नातेवाईक, त्यांच्याबरोबर येणारे चेहेरे पडलेले आप्त, मधूनच अॅम्ब्युलन्सची वर्दळ आणि त्याबरोबरच आपला हविर्भाग मिळण्यासाठी आतुर असलेले काव काव ओरडणारे असंख्य कावळे. मधूनच दुरून ची ची आवाज करत उडणार्या घरी. असा एकंदरीत उदास वातावरण. समोर दिसणाऱ्या अशोकाच्या झाडावरून उड्या मारणारी भारद्वाज पक्ष्याची जोडी तेवढी मनाला सुखावून गेली, शुभशकून समजतात ना त्याचे दर्शन, त्यामुळे. स्मशानभूमी मधील कर्मचारी त्यांच्या कामात व्यग्र होते. इतक्यात आमच्या एका सहकार्याला तो भेटला, त्याचा बालपणीचा सवंगडी, मार्शल सध्या स्मशानभूमीत कर्मचारी म्हणून काम करणारा. दोघांची अनेक वर्षानी भेट झाली, आणि काय कसं काय? हा प्रश्न ऐकायला मिळाला. ते दोघे गप्पा मारू लागले आणि मी त्यांच्या जवळच पारावर बसून ऐकत होतो. त्यांच्या सामायिक ओळखीच्या मित्रांबद्दल चौकशी, वैयक्तिक संसाराविशायीची माहिती अश्या त्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. मार्शल गेली १९ वर्षे इथे काम करतोय असे त्यांच्या बोलण्यातून समजले. अर्थातच त्याने आपल्यापेक्षा जास्त पाहिलंय, माझ्या मनात आलं. भूत बघितलत का हो कधी? मी लहान मुलासारखा प्रश्न मध्येच विचारला. मार्शल हसला. हो, बघितलय की, एक नाही चिक्कार बघितलीत. आता काहितरी सुरस व चमत्कारीक  कथा ऐकायला मिळणार म्हणून मी सावरून बसलो.
इथे येतात भुतं, मार्शल सांगू लागला. पण ती सुलट्या पावलाची आणि उलट्या काळजाची असतात. आपण सगळेच इथूनंच जाणार हे माहित असतं इथे येणार्यांना, पण आयुष्याभर ‘मी आणि माझंच’ असं काल्पनिक कुंपण स्वतःभोवती मांडून बसतात. त्यापलीकडे जगंच नसतं साहेब. मग एखादा पुण्यात्मा निजधामास जातो त्याच्या शरीराबरोबर अशी भूतं येतात, चेहरे पाडून वर वर ती दुखी असल्याच नाटक करत असतात पण आतून उलट स्थिती असते. तिसर्या माणसाला त्यांच्या देहबोलीतून हे समजतच साहेब. माणूस जितका कर्तुत्ववान तितका त्याचा लोक संग्रह मोठा. दोन्ही प्रकारचे लोक येतात, चांगले आणि वाईट. मग काय, अशी भुतं असतातच सगळ्यांच्याच नशिबात. पण साहेब त्याची काय फिकीर करायची. असतील शितं तर जमतील भूतं अशी म्हणच आहे ना! मार्शल च्या निरिक्षणानं मलाच नव्हे तर तिथे उपस्थित सर्वांनाच चकित केलं.
अहो इथे चालणारे सगळे मंत्रोच्चार, आणि कर्मकांड ही गेलेल्यासाठी नसतातच, त्याच्या भोवती हि जी भूतं नाचत असतात ना त्यांच्या साठी असतात. आता हट्ट सोडाअसा त्याचा खरा अर्थ आहे. मरण कुणाला चुकलय साहेब, आपण कसे जगतो याला महत्व आहे. चला मी जातो, काम पडलय, अस म्हणून मार्शल उठला. ‘भेटू परत’ असे म्हणून गेला सुद्धा. त्याच्या आनंदात असण्याच रहस्य मला कळल.

स्मशानात राहणाऱ्या आणि त्या व्यवस्थेवर उदरनिर्वाह असणार्यांना मसणजोगी म्हणतात अस मी मागे कुठे तरी वाचल होत. मार्शल ला भेटल्यावार स्मशानयोगी या शब्दाचा हा अपभ्रंश असावा अस मला वाटून गेल.    

Thursday, January 21, 2016

नट सम्राट

२१ जानेवारी २०१६; नट सम्राट :
गेल्या गुरुवारी नटसम्राट पहिला. सिनेमाची तिकिटे काढताना आणि तो पाहताना खर सांगावं तर एक प्रकारचा विषाद मनात होता, आपण आपले पैसे खर्चून कोणा काल्पनिक माणसाची कुतरओढ का पाहतोय असं वाटत होत. नाना पाटेकर व इतर सर्व कलाकार यांचा अभिनय आणि एक से एक अत्युच्च पातळीवरचे संवाद यांनी मात्र खुर्चीला खिळवून ठेवलं होतं. काही संवाद तर इतक्या उंचीवरचे आणि संवादफेक इतकी उत्तम की त्याचा अर्थ समजावून घेऊ की नानांचा अभिनय पाहू अश्या कात्रीत मी सापडलो होतो. मी काही समिक्षक नाही, ना मी मराठी वाङमयाचा अभ्यासक, आदरणीय कुसुमाग्रजांच्या मूळ संहितेचे वाचन काही मी केलेलं नाहीये. कथेचा गाभा हा करुणाप्रधान कौटुंबिक विषय आहे आणि निम्मे प्रेक्षाग्रुह ते पाहताना हुंदके देताना आणि उसासे सोडताना मी पाहिलं. प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेला पण अव्यवहारी, रीत-भात न सांभाळणारा अशी नटसम्राटाची व्यक्तिरेखा. चित्रपटाच्या शेवटच्या स्वगतात ते म्हणतात की हा नटसम्राट इथे संपला नाहीये, तो कणाकणानी वाढतोय प्रेक्षकन्च्य मनात माझ्या बाबतीत अगदी हे खरा झालंय. गेला एक आठवडा मी त्या व्यक्तिरेखेचा विचार करतोय आणि त्याचा एक वेगळाच पैलू मला आवडू लागलाय.
माझ्या मते नटसम्राट ही एका यशस्वी आणि समृद्ध जीवन जगणाऱ्या माणसाची कथा आहे. वरकरणी ती शोकांतिका आहे खरी पण बिनधास्त जगाव कसं याचा तो एक वस्तुपाठ आहे. स्वत:ची संपूर्ण ओळख स्वत:ला असणारा आणि स्वत: मिळवलेल्या वैभवाचा उपभोग घेत असतानासुद्धा त्यापासून मनाने अलिप्त असणारा हा माणूस. त्याने घेतलेले अव्यवहार्य निर्णय पुढे त्याच्याच आणि त्याच्या कुटुंबाच्या अंगाशी येतात तरी त्याबद्दल कोणतीही तक्रार कोणाकडेही न करणारी असामी. ‘जग हे एक संगमंच आहे जिथे प्रत्येकाला आपली भूमिका वठवायची आहे आणि माझी भूमिका हे शोकांतिका आहे’ इतकी स्पष्ट कल्पना स्वत: बद्दल ठेवणारी हे व्यक्तीरेखा. अतिशय अभ्यासु आणि आपण साकारलेल्या भूमिकांची कागदावरली दु:ख स्वतः जगणारा आणि त्याची जाणीव ठेवणारा हा नट. किती जण अस मनस्वी आयुष्य जगू शकतात? असा प्रश्न मनात निर्माण करून गेला.
चित्रपटातील विक्रम गोखले यांनी साकारलेल राम्या हे पात्र ही त्याची आरशातील प्रतिमा किंवा दुसर मन असाव अस मला वाटून गेलं. त्यांच्यातील संवाद हे एकतर्फी वाटतात. या पात्राने दिलेला व्यवहारी सल्ला तो कधी मानत नाही आणि धुडकावतही नाही. तो चालतो त्याला वाटेल तसं आणि मग येणाऱ्या परिस्थितीचा स्वीकारही करतो सहजपणे, कोणतीही तक्रार न करता, सहजपणे.
जागाव कस वाघासारख, कुणाचीही भीती न बाळगता......भरारी घ्यावी बिनधास्त गरुडासारखी, आभाळाला पंखात सामावून घेण्याची ताकद बाळगत....प्रवाही रहाव कस बिनधास्त पाण्यासारख, वाहत जाव आयुष्य फुलवत आणि कडेलोट होईल असे वाटल तर फेकून द्याव स्वत:ला एक प्रपात बनवत...... अशा काही कुठेतरी वाचलेल्या आणि अर्धवट लक्षात राहिलेल्या कवितांच्या ओळी मला स्मरल्या. असे आयुष्य जगणारया एका मनस्वी माणसाची ही कहाणी. वरवर अशी माणस ही रीत-भात न सांभाळणारी, फाटक्या तोंडाची खरी पण त्यांचा त्यांच्या विषयातील सखोल अभ्यास आणि मनस्वीपणा त्यांच्याबद्दल हवे हवे पणाची भावना निर्माण करून जातो. समाजात जगण्याचे काटेकोर नियम पाळताना वर वर मिळमिळीत वाटणाऱ्या नेहमीच्या आयुष्यात अशी एखादी संगत असावी असं आपल्याला वाटत असतं. कधी आपणच असं बनावं असं मन म्हणतं, पण ते अवघड आहे, असं बिनधास्त जगण्याची उर्मी येते तशीच निघून जाते नाही बुवा आपल्याला जमणार असे वाटून.

आनंद, दु:ख, राग, लोभ या भावना असतात प्रेक्षकाच्या मनातल्या, नट फक्त त्या उलगडून दाखवतो, असं हा नटसम्राट एका प्रसंगात म्हणून जातो. त्याला अनुसरून....... मला जे भावलं ते लिहीलं.  

Monday, January 11, 2016

एका उद्योजकाचा मृत्यू

११/०१/१६ एका उद्योजकाचा मृत्यू:   
आमच्या काही समसुखी समदु:ख्खी  उद्योजक मित्रांबरोबर चहापानासाठी कंपनीतून बाहेर पडत होतो. सहज समोर एक फ्लेक्स दिसला मशिनरी विकणे आहे, शेड भाड्याने देणे आहे. माझ कुतुहल चाळवल. त्या फ्लेक्स वर एक फोन नंबर होता. त्यावर मी फोन लावला. पलीकडून एक अत्यंत पडेल आवाजात उत्तर आल. सबब शेड ही आमच्या कंपनीपासून जवळच होती. भेटायची तारीख आणि वेळ ठरली.
त्या दिवशी मी तिथे थोडा अगोदरच पोचलो. संतोष त्याच नाव. त्याला फोन केला, एका जर्जर झालेल्या मोटार सायकलवरून संतोष तिथे आला. मध्यम उंची, कृश बांधा, दाढीचे खुंट वाढलेले. चेहऱ्यावर कमालीचा ताण आणि डोळे खोल गेलेले असे त्याचे रूप बघून मला काळजात चर्र झाले. आपणच फोन केला होतात ना? त्याने माझ्याकडे बघून विचारले. मी हसून ओळख करून घेतली. तो शेडकडे वळला, खिश्यातून किल्ली काढून त्याने शटरचे कुलूप उघडले. शटर उचलण्यासाठी मी त्याला मदत करायला पुढे झालो. शटरवर बरीच धूळ होती. बहुदा गेल्या दोन आठवड्यात ते उघडलेले नसावे. शटर उघडल्यावर धूळ झटकत आत गेलो. आत कोणच्याही मशीन शोप मध्ये दिसतात ती नेहमीची मशीन्स दिसत होती. माझ्या कामाची होती. काही ठिकाणी वायरी लोंबकळत होत्या. त्या जागची मशीन्स विकले असे संतोष ने सांगितले. खिशातून एक कागद काढून उरलेल्या मशीनची यादी त्याने समोर केली. दोन महिन्यांपूर्वी पर्यंत मशीन्स चालू होती. काही बिघाड झालेली नाहीत. त्याने सांगितले. तुम्हाला हवे तर चालू करून बघू शकता. मग किमतीविषयी बोलू त्याने प्रांजळपणे सांगितले. मी मुळातच मशीन्स घेण्यासाठी तिथे गेलो नव्हतो. हे मशीन शॉप बंद का पडतंय याचा शोध घेण्यासाठी मी तिथे गेलो होतो.
मी शेड मध्ये फिरून सर्व मशीन्स बारकाईने बघितली. बहुधा सेकंड हँड घेतलेली असावीत, पण चांगली वापरलेली होती. ठीक आहे, कुठे चर्चा करता येईल? मी प्रश्न केला. जवळच एका अमृततुल्यमध्ये आम्ही चर्चा करायला बसलो. संतोष तसा साधा वाटला. त्यामुळे मी थेट मुद्यावर आलो, मी मशीन्स घेण्यासाठी आलो नाही, तुम्ही उद्योग बंद का केलात हे जाणून घेण्यासाठी आलोय. तसं फोनवर बोलता आलं असतं, पण भेट झाली तर आणखीन काही कळेल असं वाटलं म्हणून आलो. मी प्रांजळपणे सांगून टाकलं. उद्योग जसा चालू केला तसाच बंद केला, तुम्हाला सांगून काय उपयोग, तुम्ही काही करू शकणार नाही संतोष थोडा वैतागून म्हणाला. थोडा वेळ शांततेत गेला. त्याची काही सांगायची इच्छा नसावी किंवा तो शब्द गोळा करत असावा. मीही उद्योजक आहे. उभा राहिलेला उद्योग बंद करण्याचा विचार सुद्धा किती त्रासदायक असतो हे मी जाणतो. म्हणून विचारावसं वाटलं. मी म्हणालो. संतोष बोलता झाला.
घरची बेताची परिस्थिती. आई वडिलांनी कष्ट करून त्याचं शिक्षण पूर्ण केल. त्या दोघांना त्यानं नोकरी करताना, अपमान गिळताना पाहिलं आणि म्हणून ठरवलं की अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यावर नोकरी करायची नाही. स्वत: उद्योग करायचा. उद्योगाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना धडपड करून, उधार उसनवारी करत भांडवल त्यानं उभं केलं. मित्रांच्या सहकार्यातून, ओळखीतून काम मिळवत उद्योग उभा केला. ७-८ वर्षात केलेली सर्व कर्ज फेडत त्यान उद्योग स्वयंपूर्ण केला. आणि त्यानंतर चांगले दिवस यायच्या ऐवजी ग्रहण लागलं. कोणच्याही उद्योगाच्या सुरुवातीच्या काळात भिस्त ठेवता येईल असं एखादं प्रॉडक्ट, ग्राहक किंवा मार्केट लागतं. असा किती भक्कम पाठींबा मिळतो त्यावर तो नुकताच जन्मलेला उद्योग किती बाळसं धरतो ते अवलंबून असत. संतोषच्या बाबतीत नेमकं उलटं घडलं. ज्यावर भिस्त ठेऊन तो उद्योग वाढवायची स्वप्न बघत होता तिथलं व्यवस्थापन बदललं. पूर्वीच व्यवस्थापन नेटकं पण सर्वांना बरोबर घेऊन चालणारं होत. नवीन आलेले लोक हे जगाची रीत या नावाखाली दुसर्याच्या डोक्यावर पाय  देऊन पुढे जाऊ पाहणारे होते. त्यानी संतोषकडे भाव कमी करण्याविषयी तगादा लावला. लघु उद्योजक म्हणजे त्याकाडील कामगार अशिक्षित, कमी मजुरी मिळणारे असणार मग माल स्वस्तात बनलाच पाहिजे असा आग्रह धरणारी ही मंडळी होती. कामगारांचे स्वास्थ्य, त्यांची उन्नती हा विचार त्यांच्या दृष्टीने गौण होता. तीच त्यांच्या मते जगाची रीत होती. अश्याप्रकारे वागताना कामगारांचे आणि पुरवठादारांचे एक प्रकारे शोषण करून आपण सामाजिक अपराध करतोय असे संतोषचे म्हणणे होते.
व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांना समान सन्मान मिळाला पाहिजे हे संतोषचे तत्व इथे विरोधात जाऊ लागले. संतोषने विरोध केला नाही, पण वेगळी वाट पकडायचा प्रयत्न केला. दुर्दैवाने त्याला तीन, चार ठिकाणी असेच लोक भेटले. ज्याला त्याला कमीत कमी पैश्यात पण सर्वोत्तम काम करून हवे होते. कसेही करून काम मिळवण्यासाठी आणि मग ते कसेही करणार्यांची रीघ अश्या लोकांकडे लागलेली संतोषने पाहिली. आपण उराशी बाळगलेल्या मूल्याला तिलांजली देण्यापेक्षा स्वत: रक्त आटवून उभा केलेला उद्योग बंद करण्याचा दुर्दैवी निर्णय त्यानं घेतला. त्याचं त्यात किती आर्थिक नुकसान झालं किंवा होणार होतं हे मी त्याला विचारलं नाही. पण त्याच्या सांगण्यावरून आर्थिक अडचणीमुळे त्यानं हा निर्णय घेतला नव्हता. त्याच्यातील अंतर्विरोधाचा तो दुर्दैवी बळी ठरला होता.
उद्योग उभा करताना आणि चालवताना काय काय अडचणी येतात ते उद्योजकच जाणे. उद्योग उभा होणे किंवा बंद करणे हा बर्याच वेळेस आर्थिक कारणांशी सुसंगत निर्णय असतो. उद्योग बंद होणे म्हणजेच मृत्यू पावणे ही घटना क्लेशदायक नक्कीच पण इथे एका उद्योजकाचा मृत्यू झालेला मी बघत होतो.
एखादी ग्रहमाला भोवती घेऊन फिरण्याचे सामर्थ्य असलेला सूर्य आणि आपल्या उद्योगातील सहभागी लोकांना बरोबर घेऊन फिरणारा स्वयंप्रकाशित उद्योजक यांची तुलना मी सतत करत असतो. संतोष हा एक स्वयंप्रकाशित सूर्य होता पण आता त्याचं तेज लोप पावलं होतं. तो सूर्यास्त मी समोर बघत होतो, त्याच्यातली धग मात्र स्पष्ट जाणवत होती.

तो, त्याचा उद्योग, त्याचे प्रश्न, मी फार विचार करावा असे त्यात काही नव्हते. पण त्याच्या बरोबर झालेल्या संवादातून एक प्रश्न मात्र त्याने समोर उभा केला ज्याच त्यांनाच दिलेलं उत्तर मला कायम मार्गदर्शक ठरणार आहे. लघु उद्योग ग्राहकाला काय देऊ शकतात? १) स्वस्त सेवा आणि  सुमार उत्पादन, २) स्वस्त सेवा आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन कि ३) गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि अशी सेवा ज्यामुळे ग्राहक निश्चिंतपणे त्याचा उद्योग करू शकेल. लघु उद्योगांनी आपले उत्पादन स्वस्तठेवावे कसे? आणि ठेवावे का? आपल्या उद्योगाशी संबंधित व्यक्तींचे अप्रत्यक्षपणे शोषण तर होत नाही ना ही खबरदारी प्रत्येक उद्योजकांने घेतलीच पाहिजे असे तो जाताना म्हणाला. त्याचे हे म्हणणे मला मनोमन पटले. कोणत्याही उद्योगाच एक USP  असतं. दुर्दैवाने स्वस्त उत्पादन हे USP  लघु उद्योगांनी बनवलेल्या वस्तूंना चिकटलय. त्यातून बाहेर पडायला हवं. उत्कृष्टतेची कास धरताना स्वस्त नव्हे तर सर्वोत्तम पण किफायतशीर हे विशेषण कसे धारण करता येईल याकडे लक्ष द्यायला हवं.           

Friday, December 25, 2015

समस्या- संयम आणि उपाय

डायनिंग हॉल मधील एक टेबल, चार माणसं बसू शकतील एव्हढ. त्या टेबलचे चार पाय आणि समतल जमीन यांचा एकत्रित संबंध कधी न आल्यामुळे डुगडुगणारं. दुपारची जेवणाची वेळ होती. एका टेबल वर एक व्यक्ती जेवत होता. त्याच्या समोर कोनात दुसरा येऊन बसला. दोघेही एकमेकाला अनोळखी. म्हणून अगदी समोरासमोर नाही. अशीच स्थिती दुसर्या टेबल वर होती. खळग्यांचे ताट, त्यात नेमक्या जागी नेमके पदार्थ वाढलेले. वाढप्यांची लगबग आणि त्यांच्यामागे त्यांच्या सुपरवायजरचा धोशा अस परिचित वातावरण. जो आधी जेवायला बसला होता त्याचा हविर्भाग संपला आणि तो पानावरून उठला. टेबल जरासं एका बाजूला कललं. समोर बसलेल्या व्यक्तीच्या ताटापुढील ताकाच्या ग्लासमधल टाक हिंदकळल.   टेबल साफ करणारा पोऱ्या तिथे आला. छोटासा पोर तो, गावाकडून आलेला, डायनिंग हॉलच्या युनिफॉर्म चा मळका शर्ट आणि अर्धी विजार घातलेला, खांद्यावर टेबल पुसण्यासाठी फडके. एका कानात डूल घातलेला. येथे बाल कामगार काम करत नाहीत हा बोर्ड कदाचित त्याला वाचता येत नसावा किंवा बहुतेक मजबुरी असावी.
त्यान ताट उचललं, आणि ते बाजूला ठेवून टेबल पुसू लागला. मागे दुसरं गिर्हाईक उभं त्याच दडपण होत त्याच्यावर. त्यान टेबल पुसू लागताच ते चांगलाच डुगडुगलं आणि समोर बसलेल्या व्यक्तीच्या पानासामोरील ताकाच्या ग्लासमधील ताक थोडसं सांडलं. ए गाढवा, कळत नाही का तुला? ती व्यक्ती रागात उठून म्हणाली. आता त्या सांडलेल्या ताकाचे पैसे कोण देणार, कसली लोकं भरतात या धंद्यात, लेकाच्याला एवढं कळत नाही तो जाम तडकला. ‘माझा शांतपणे जेवणाचा मूड गेला’ असे तावा तावाने म्हणत, तिथलं वातावरण गढूळ करत आणि त्या पोराला बोल लावत तडका फडकी हात धुवायला निघाला. तो पोऱ्या कावरा बावरा झाला. आता सुपरवायझर सर्वांच्या देखत ओरडणार म्हणून रडवेला झाला. आणि झालंही तसच. तो थोडावेळ बावचळला आणि मान खाली घालून टेबल पुसू लागला.
एवढ्यात एक गम्मत झाली. शेजारच्या टेबलवरची एक व्यक्ती ढेकर देत उठली. सुपारवायझरने त्या पोऱ्याला दुसरेही टेबल साफ करायला सांगितलं. आधीच्या अनुभवावरून तो पोऱ्या शहाणा झाला, त्यानं ताट उचललं पण टेबल तो पुसेना. समोरच्या जेवत बसलेल्याच्या ते लक्षात आलं, त्यान पटकन ताक भरलेला ग्लास डाव्या हातांनं उचलला आणि हसून त्या पोऱ्याकडे बघितल. तो पोरगाही गोड हसला आणि त्यान ते डुगडुगणारं टेबल स्वच्छ पुसून घेतल. त्या सहृदय माणसाच जेवण झालं, तो उठला, हात धुवून येताना तो मुलगा हातात बडीशेपची वाटी घेऊन हसत समोर उभा होता!
समस्या एकच, उपाय वेगवेगळा, आपल्याच हाती!


Sunday, December 13, 2015

घटना - गुन्हा आणि शिक्षा

शुक्रवारी सायंकाळी ४.३०-४.४५ च्या सुमारास प्रवीण ऑफिस मध्ये आला आणि पेटी कॅश चे व्हाउचर त्याने माझ्या समोर ठेवले. गाडीला फारच स्क्रॅचेस पडले होते सर. त्यामुळे मी ते घालवण्याचे लिक्वीड   घेऊन टाकले. ७५० चा आयटम ५०० मध्ये घेतला सर त्याने मला स्पष्टीकरण दिले. त्याने परस्पर खर्च केला त्यामुळे माझ्या कपाळावर आठी चढली. पण कामात व्यत्यय नको म्हणून मी त्याच्या व्हाऊचरवर सही करायला घेतली. सवयीप्रमाणे वरच्या लिस्टवर नजर टाकताना शेवटच्या ओळीत आर. टी. ओ. – १०० रू. असे दिसले आणि सही करता करता अर्ध्यातच थांबलो. हे काय? आर. टी. ओ. ला कुठली दक्षिणा ? मी प्रश्न केला. प्रवीण जरा गडबडला, चाचरत म्हणालासर, गाडीला थोडासा अपघात झाला, गाडीचे काही नुकसान झाले नाही पण मामाने पावती फाडली. माझी काहीच चूक नव्हती सर. मी सरळ येत होतो पण वडगावच्या सिग्नलला रस्त्यावरचं ते प्लॅस्टीकच बॅरीकेड मध्येच ठेवलं होत. त्याला डॅश बसला. मामानं उगाच डोक खाल्लं नंतर. प्रवीणन सफाई दिली. मी ताडकन उठलो, सरळ खाली गेलो, प्रवीण मागे मागे आला. गाडीला प्रदक्षिणा घातली. गाडीला धडक बसल्याचे कुठे काही चिन्ह दिसेना. गाडीच्या स्क्रचेस पुसण्याचा आयटम स्वत:हून कसा काय त्यान आणला याचा मात्र उलगडा झाला.
प्रवीण, आमच्या कंपनीतला वाहन चालक. तो वाहन चालवण्यात जितका ‘प्रवीण’ होता तितकाच बोलबच्चन करण्यातही. कंपनीतल्या उनाड कंपूचा तो त्यामुळे हिरो होता आणि साळसूद कंपू मात्र त्याच्या वागण्यावर लक्ष ठेउन असायचा. मगाशी झाला कार्यक्रम हा शिफ्ट संपताना झाल्यामुळे बरेचसे कर्मचारी बाहेर पडण्याच्या तयारीत होते. त्यानी सर्व कार्यक्रम बघितला. माझ्या पाठोपाठ प्रवीण, त्याच्या पाठोपाठ त्याचे समर्थक आणि त्यांचाही पाठोपाठ त्याच्यावर लक्ष ठेवणारे त्याचे विरोधक माझ्या केबिनच्या बाहेर आले.
मी काही कारवाई करणार आहे का नाही हे न विचारताच,  “सर जाउद्या हो. विशेष काही घडलेले नाहीये प्रवीणच्या समर्थनार्थ एकाने मला विनंती केली. सर हा असाच जोरात गाडी चालवतो, उद्या काही मोठा अपघात झाला म्हणजे? काही नाही सर, त्याला सरळ कामावरून काढून टाका त्याच्या विरोधकातून  एक आवाज आला. मी शांतपणे दंडाची पावती काढली. त्यावर प्रवीणचे नाव होते, पण गाडीचा नंबर नव्हता. खाली ‘गुन्ह्याचे स्वरूप’ या समोर दोन कलमे होती आणि पुढे त्याचे विवरण दिले होते ‘ बेदरकारपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत होणे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान. पुढे ‘दंडाची रक्कम छापलेली होते आणि हाताने घातलेला आकडा होता शंभर रुपये खाली हवालदाराची सही, हुद्दा, पोलीस स्टेशनचे नाव इत्यादी असलेला शिक्का.
मी प्रवीणच्या विरोधकातील एकाला म्हणले की जरा पुन्हा एकदा गाडी नीट बघ, कुठे काही धडकल्याची खूण दिसतेय का. तो आनंदाने गेला. बर्याच वेळाने परत आला तेंव्हा मला अपेक्षित असलेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर नव्हता. सर पुढच्या बम्परवर उजव्या बाजूला ओरखडे आहेत पण ते आजच पडलेत असे वाटत नाहीत, पूर्वी कधीतरी पडलेले असू शकतील. बाकी कुठे काही नाहीये. त्याने पडेल आवाजात पाहणी अहवाल दिला. सर तेच तर म्हणतोय, गाडीला काही झालेले नाही. मुळात सर हा अपघात आपल्या कंपनीच्या गाडीला झालाच नाही, मी माझ्या मोटरसायकलच्या अपघाताबद्दल बोलत होतो इतक्या वेळ. नाही का तुम्ही मला बँकेत पाठवलं होतं सकाळी? तेंव्हा मी माझी मोटरसायकल घेऊन गेलो होतो. आता प्रवीणने सपशेल पलटी मारली. सगळेच लोक बुचकळ्यात पडले. त्याचा होरा माझ्या लक्षात आला.
सरकार दफ्तरी भरलेली दंडाची रक्कम खर्च म्हणून दाखवता येत नाही मी माझं कायद्याचं जुजबी ज्ञान पाजळत म्हणालो. मी हा खर्च अमान्य करत आहे. बाकी ठीक आहे. जा आता, वाहन जरा जपून चालवत जा रे!”,  मी त्याची सुटका केली.
प्रवीणचे समर्थक जोशात तर विरोधक नकारार्थी मान हलवून बाहेर पडले. थोड्या वेळाने मी गाडी घेऊन घरी निघालो. वडगावच्या चौकात सिग्नलला गाडी थांबली आणि माझे लक्ष दुभाजकाकडे गेलं. तुटलेला एक प्लास्टिकचा बॅरीकेड मला पडलेला दिसला. माझं कुतूहल चाळवलं. मी गाडी पुढे जाऊन पार्क केली आणि चालत येऊन वाहतूक हवालदाराला विचारलं इथे या बॅरीकेडला आज दुपारी एखादी पांढर्या रंगाची गाडी धडकली होती का हो ? मला आपादमस्तक न्याहाळत तो हवालदार उत्तरला होय, पण तुमचा काय संबंध? रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या माझ्या गाडीकडे बोट दाखवत मी त्याला म्हणलं ती गाडी होती का? माझी आहे. माझ्या ड्रायव्हरन अपघात केला का? हवालदारानं गाडीकडे पाहिलं, मग माझ्याकडे पाहिलं, साहेब ती सुमो होती, तुमची तर मारुती आहे. काळजी करू नका तुमच्या गाडीनं ती धडक दिलेली नाही.” ........तडजोड काय झाली असेल ते माझ्या लक्षात आल. बॅरीकेड तुटला होता, गाडीवर आणि प्रवीणच्या प्रतिमेवरही ओरखडे उठले होते.
घरी जाऊन पुन्हा ती पावती बाहेर काढली. इंटरनेट वर त्याची कलमं टाकून माहिती वाचू लागलो. गुन्ह्याची कलमं आणि त्याचे विवरण यात फरक होता. त्या गुन्ह्यासाठी दंडाची रक्कम आणि आकारलेली रक्कम यात कमालीचं अंतर होतं. हवालदाराने कर्तव्यदक्ष भूमिकेतून कारवाई केली होती पण पावती वरचा मजकूर अपूर्ण होता.

प्रवीण दुसर्या दिवशी ऑफिसमध्ये आल्या आल्याच त्याला १० दिवसाच्या सक्तीच्या बिन-पगारी रजेवर पाठवण्यात आलं. कंपनीच्या गाडीचे नुकसान केले म्हणून नव्हे तर ‘कंपनीची दिशाभूल करून फसवणुकीचा प्रयत्न केल्याबद्दल आणि हो,...... ही शिक्षा सुनावण्यासाठी न कुठल्या फिर्यादीची गरज पडली न कुठल्या सुनावणीची, न कुणाच्या वकीलपत्राची!! ---- (वरील घटना व त्यातील पात्रे ही संपूर्णपणे काल्पनिक असून सुमारे १३ वर्षांपूर्वी घडलेल्या, वरचे वर चर्चेत आलेल्या आणि नुकत्याच चवीने चघळल्या गेलेल्या घटनेशी त्याचे साधर्म्य वाटल्यास.............................. ते तसे आहेच! ) – सत्यजित चितळे

Friday, December 4, 2015

निमित्तमात्र...

भाटघरच्या जलाशयातून उगवणारं सूर्यबिंब राजगडाच्या बालेकिल्यातून बघून झाल्यावर आम्ही संजीवनी माचीचा रस्ता पकडला. अळू दरवाज्यातून उतरून भूतोंडे गावाच्या दिशेने चालू लागलो. भूतोंडे- चांदवण करत कुंबळी गावाला पोचेपर्यंत रात्र झाली. वाडीवरच्या भटक्या कुत्र्यांनी आमचं स्वागत केलं. गावातील एकमेव मंदिर छोटंसं असल्यानं वस्तीला सोयीचं नव्हतं. त्यामुळे गावच्या पाटीलांनी आम्हाला त्यांच्या घराच्या पडवीतच मुक्काम करण्याविषयी सुचवलं. पडवीच्या पलीकडेच दावणीला गुर बांधलेली होती. तिथंच रात्र काढूयात, उद्या सकाळी गोप्या घाट उतरला की आलीच समोर शिवथर घळ, आमचा बेत ठरला. पाटलीणबाईनी स्टोव्ह देऊ केला. त्यावर मुगाच्या डाळीची खिचडी शिजवली आणि त्यावर ताव मारला. भांडे धुवून आवरा आवर करून पथारी पसरणार एवढ्यात पाटील जातीने चौकशीला आले. आम्ही तिघांनी आमची ओळख करून दिली. राजगडाहून शिवथरघळीपर्यंत पायी जायचा बेत आहे,  उद्या गोप्या घाटातून जाणार आहोत आमचा ट्रेकचा बेत सांगितला. पाटील पुण्याच्या तरूणाईशी परिचय असणारे होते त्यांनासुद्धा अश्या आडवाटा चोखाळणार्यांच कौतुक होतं.
त्या दिवशी त्यांच्याकडे सोयरिकीच बोलण करायला दोन पाहुणे आले होते, भूतोंडे गावाकडून. ते आतूनच आमचा बोलणं ऐकत होते. आम्ही शिवथरकडे जातोय असे ऐकल्यावर ते बाहेर आले अन म्हणाले हितून लई लोक जात्यात तुमच्यासारखे, आमची जिंदगी गेली पर आम्ही गेलो न्हाई. पाटील येकदा जाया होवं. न्हाईतर आपन राह्याचो कोरडेच”. “ चला आमच्या बरोबर, आम्हाला सोबत होईल संदीप म्हणाला. पाटील हसले. उद्याच्याला चा च्या टायमाला बोलू. निजा आता म्हणाले आणि पाहुण्यांसहित आत गेले.
दिवसभर चालून दमलेले आम्ही तिघे पडवीतच गाढ झोपी गेलो. पहाटे झुंजूमुंजू होताच कोंबडा आरवला त्यानं जाग आली. आवरून घेतल, सॅक भरून निघायची तयारी केली. पाटलीणबाईंनी चहा दिला. तो घेऊन आणि त्यांना धन्यवाद देऊन गोप्याच्या खिंडीकडे निघालो. थोडा चढ, घनदाट झाडी आणि मग गोप्या घाटाची अरुंद खिंड. खिंडीत जरा टेकलो तर मागून आवाज आला पाव्हणं दमलं व्हय? मागे बघतो तर पाटील आणि त्याचे दोन पाहुणे. म्हन्ल आजच उरकून घिऊ. किती दिस नुस्त जायाच, जायाच म्हून काडनार. पाटलांनी खुलासा केला. आम्हाला मागे टाकून ते घाट उतरून निघाले देखील. आमच्या चालीच्या मानानं त्यांची मावळी चाल खूपच वेगाची होती. घाटाखालच्या जंगलात ते दिसेनासे झाले.
आम्ही घाट उतरून सपाटीला लागलो तेंव्हा ते तिघे उलट येताना दिसले. जवळ येताच त्यांनी रामराम केला. संदीपकडे बघून म्हणाले तुमी म्हन्ला म्हनून जाल बघा.” . संदिपचं कालच पोकळ निमंत्रण निमित्तमात्र होत. पण ते एक कारण ठरल त्यांना समर्थांच्या दर्शनाचं समाधान मिळवून देण्यात. आम्ही हसलो, त्यांचा निरोप घेतला आणि पुढे चालू लागलो.
अश्या अनेक गोष्टी घडतात जेव्हा आपण असतो केवळ निमित्तमात्र. किंबहुना सगळ्याच गोष्टी अश्या असतात जिथे आपण असतो केवळ निमित्तमात्रच!

मला पेपर मध्ये वाचलेली एक बोधकथा आठवते, स्वामी रामकृष्ण परमहंसांची. एकदा त्यांनी शिष्यांना उपदेश करताना अस सांगितल जाऊ का नको जाऊ असा प्रश्न पडेल तेंव्हा ‘जा’ आणि खाऊ का नको खाऊ असा प्रश्न पडेल तेव्हा ‘नको खाऊ’, या दोन उत्तरात सगळ आल.  आपल असण हेच निमित्तमात्र असणं हे याच्याशी थेट संबंधीत आहे, खरय ना?