पन्हाळा ते पांढरेपाणी भ्रमंती – १२ जुलै २०२५
दगडावर दिसतील अजून
तेथल्या टापा,ओढ्यात तरंगे अजून रंग
रक्ताचा....हे कविवर्य कुसुमाग्रजांचे बोल नेसरीच्या खिंडीतल्या समरासाठी लिहिलेले असले तरी इये सह्याद्रीच्या कुशीतील प्रत्येक चिरा आणि
प्रत्येक ओहोळ या काव्यपंक्तींचा प्रत्यक्ष पुरावा आहे.
नाही चिरा नाही
पणती...अशा अनेक संग्राम वाटा आणि युद्ध भूमी वरून पदयात्रा करण्याचे भाग्य मिळावे
याहून वेगळे काय हवे. दुर्ग पन्हाळा ते विशाळ गड हा असाच एक पावन प्रवास. या
झुंजीच्या मार्गावरून पायी प्रवास केला, १२ जुलै २०२५ रोजी. ३६४ वर्षे ३६४
दिवसांपूर्वी एका दिव्य पुरुषास घेऊन एक तेजस्वी लढाऊ जथ्था इथून झुंजीत गेला
त्याची आठवण काढीत. आता याला ट्रेक म्हणतात....
दुसऱ्या दिवशी हा ट्रेक करणारे काही तुरळक ग्रुप भेटले. तेव्हा कल्पना नव्हती ही वाट तुडविण्यासाठी दोन ते अडीच हजार लोक आलेले आहेत याची.
पुसाटीच्या बुरुजाच्या आडून राजदिंडीच्या वाटेने गड उतार
होऊन रस्त्याला लागलो तेव्हा हळू हळू उजाडले होते. इथून पुढे लागते मासाई चे पठार.
९ ते ११ किमी लांबीचे विस्तीर्ण कातळ पठार, बरेचसे एकाच पातळीचे. कणखर
सह्याद्रीच्या मुख्य उत्तर दक्षिण कण्यापासून पूर्वेस विस्तारलेल्या ज्या भुजा
आहेत त्यातलीच एक भुजा. पाचगणी ची टेबल लँड, रायरेश्वराचे पठार किंवा मांढरदेवी चे
पठार आहे तेही असेच. याची रक्षीणी मासाई
देवीचे मंदिर पठाराच्या सुमारे मध्यात आहे. पठारावर दाखल झालो तेव्हा पूर्वेला
सूर्यदेव ढगांच्या आड उगवले होते आणि मोकाट वारा सुटला होता. पठारावर गवताची हिरवळ
आणि त्यातून पांढरी टप्पोर “भुई आम्ही” वर येऊन डुलत होती, अगदी बालकवींच्या आईच्या
मांडीवर बसून डोलणाऱ्या फुलराणीची आठवण यावी तशीच.
७.३० सुमारास मासाई
देवीच्या मंदिरा जवळ पहिला थांबा घेतला. पाठीवरचे थोडे तहान लाडू- भूक लाडू
पोटामध्ये गेले, हातावरच्या घड्याळातून वेळेचा आणि मोबाईलवर दाखवलेल्या अंतराचा हिशोब
समाधानकारक आहे अशी समजूत करून घेऊन पुढे निघालो. अर्ध्या तासात मासाई चे पठार
ओलांडून उतार लागला. एक तीव्र चिखल भरलेला उतार संपला आणि चिखलाने माखलेले बूट लेऊन
कुंभारवाडीतल्या डांबरी रस्त्यावर दाखल झालो.
गावातले सकाळचे व्यवहार
सुरु होते. दादले बैलं घेऊन शेताकडे आणि मातृशक्ती सकाळचे व्यवहार संपवून
धुणे-भांडी करीत होत्या. कुंभार वाडी पासून पुढे सुमारे ५-६ किमी डांबरी रस्त्याने
चाल आहे. १९ वर्षांपूर्वी पहिल्यांदा इथून गेलो तेव्हा हि वाट बांधीव होती पण
पक्का रस्ता नव्हता असे आठवले. थोड्याच वेळात डावीकडे बांदिवडे गावचे नैसर्गिक
आश्चर्य असलेले अश्म स्तंभ दिसू लागले. प्रस्तरभंगातून निर्माण झालेल्या
सह्यगिरीच्या जन्माचे हे साक्षीदार. एकावर एक ठेवलेल्या आयताकृती
जड शिळाचे स्तंभ भासावेत अशी रचना असलेले आणि त्यावर वाढून
लुप्त झालेल्या वनस्पतींमुळे नक्षी तयार झालेले हे स्तंभ लांबूनही सुंदर दिसतात.
मधूनच पक्का डांबरी रस्ता, कधी कच्ची वाट, डोंगराच्या कडेला बिलगून वाढलेली आणि राखलेली वनराईतली वाट असा प्रवास खोतवाडी, बांद्लाईवाडी अश्या वाड्यांमधून करीत २२-२३ किमी वरच्या करपे वाडीत पोचलो तेव्हा ११ वाजले होते. हा या ट्रेक मधील मध्यान्ताराचा टप्पा. इथे बरेचसे ग्रुप विश्रांतीसाठी राहतात आणि दुसर्या दिवशी मार्गस्थ होतात. इथे पक्की सडक येते, त्यामुळे ज्यांच्या पायांना इथवर चालून थकवा आलाय त्यांना इथून या ट्रेक मधून काढता पाय घेता येतो.
पूर्वी इथे मुक्काम केला
ते मंदिर माझे नेत्र शोधत होते. पण गेल्या वीस वर्षात खूप बदल झालाय. घरोघरच्या
उतरत्या छप्परांवरच्या खापरी कौलांची आणि बर्या परिस्थितीतल्या छतावरील मंगलोरी
कौलांची जागा पक्क्या स्लॅब च्या धाब्यांनी आणि काही ठिकाणी रंगीत पत्र्यांनी
घेतलेली दिसत होती.
सह्याद्रीतल्या बॉक्साईट
खाणींचा काही प्रकल्प इथे सुरु होणार असल्याचे कळले. त्याला विरोध करणारे फ़्लेक्स
गावातून लागलेले दिसले. त्याची माहिती शोधण्याचा प्रयत्न केला, पण नेमकी कोणती गावे त्यात समाविष्ट होऊन तिथला निसर्ग
भरडला जाणार आहे ते मात्र नीट कळले नाही.
आमच्या चमू तले सगळेच करपेवाडी
ला न थांबता पुढे निघाले आणि मग पुढच्या जंगलातून मार्गक्रमण करीत आंबेवाडी, कळकेवाडी, रीन्गेवाडी, माळेवाडी, पाटेवाडी असा
प्रवास करीत आम्ही सुकमाच्या धनगर वाड्यावर दाखल झालो. इथून पुढे जंगलातील वाट
संपली आणि थोड्या अंतरावर पावन खिंडीकडे जाणारा पक्का रस्ता लागला. सुमारे दोन
किमी मध्ये पांढरे पाणी गाव आले आणि आमचा ट्रेक आम्ही इथे संपवला. पावनखिंड इथून ५
किमी पुढे आहे आणि १३ तारखेला तिथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी तयारीने जाणारे अनेक जण
इथे दिसले. कोणी मोठा सरकारी पाहुणा येण्याची पूर्व खूण असलेला पोलिसांचा बंदोबस्त
या फाट्यावर दिसला यात काही विशेष नाही.
आपल्या पराक्रमी
पूर्वजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर. पांढरेपाणी गावाच्या अलीकडे एक
कमान लागली, “ शिवरायांनी घेतलेला मार्ग” असे शीर्षस्थानी बोर्ड असलेली.
दस्तुरखुद्द पावन खिंडीच्या जागे विषयी काही मतभेद आहेत. खासे शिवराय नेमके
कोणत्या मार्गाने गेले, कसे गेले या
विषयी त्यांनी किंवा ज्यांच्यासाठी ही लढाई प्राणांतिक ठरली त्यांनी नेमके लिहून
ठेवलेले नाही, असे असताना त्याविषयी उगाच विवाद करण्यापेक्षा या परिसराचे
पावित्र्य अनुभवणे जास्त श्रेयस्कर!
पन्हाळ्यावरून निघून
मासाईच्या पठारावरून उतरल्यापासून डोंगर रांग डाव्या हाताला ठेवीत जाणारी हि वाट
मुळात त्यातील मधून मधून येणाऱ्या दुर्गम जागा हेरून राजांनी निवडली असावी हे
निश्चित. पाठ्लागावरील शत्रू सैन्य आपल्याला सहज गाठू शकणार नाही अशी व्यूह रचना
त्यामागे असणार. त्यामुळे एकूणच या परिसरात तो इतिहास रचला गेला आणि हा सर्वच
परिसर पावन झाला. या वाटेने पायपीट करणाऱ्या आजकालच्या उत्साही शिलेदारांनी रस्ता
चुकू नये म्हणून वाटेवर ठीक ठिकाणी पिवळ्या रंगाचे आणि भगवा झेंडा कोरलेले मैलाचे
दगड लावलेले आहेत. घनदाट वाढलेल्या जंगलातून माणसं हरवू नयेत यासाठी.
१२-१३ जुलै हे आषाढातील पावसाचे दिवस, इथे कधी घोट्या इतका कधी गुढग्या इतका चिख्खल, वाट अडवायच्या बेताने मध्ये येणारा तुमुल झाडोरा, कुठे उतारावरच नव्हे तर सपाट पठारावर सुद्धा घसरगुंडी होईल असा निसटलेला पावठा, जंगलातील उघड्या माळावर कुठे दहा वीस फुट व्यासाचा पाण्याने भरलेला खळगा, नितळ, आभाळ भरलेल्या आकाशाचे प्रतिबिंब दाखवणारा,
कुठे मोठा जलाशय, रस्त्याकडेने
वाहणारे झरे, कुठे त्यात चारेक फुटाचा
खड्डा, मोकळ्या मुरूमाच्या वाळू आणि मातीने भरलेला-
चुकून इकडे पाऊल टाकणार्याला गिळंकृत करण्यासाठी आ वासून बसलेला, वाटेवर आडवे
घातलेले असंख्य ओहोळ आणि ओढे. ओहोळ आणि ओढा या शब्दांमधील फरक जाणवण्या इतका प्रवाहातील फरक असलेले. काही स्वच्छ पाण्याचे
प्रवाह तर कधी वरच्या अंगाला पाऊस सुरु आहे याची ओळख म्हणून गढूळ पाण्याचे दर्शन
घडविणारे. त्यातून खुश्शाल पाय घालावा. मोठ्या चालीने कातावलेले पाय त्या थंड
पाण्याने एकदम शांत व्हावेत आणि पुढे पावले रेटायला धीर यावा. सुकमा च्या धनगर
वाड्या आधी असलेला राजनकडा धबधब्याकडे जाणारा मोठ्ठा ओढा, नेहमीच मांडीइतका भाग
सुस्नात करीत ओलांडावा लागणारा, थंडगार स्वच्छ नितळ पाणी वाहून नेणारा. हा ट्रेक
नेहमी करणाऱ्या एका ग्रुप ने त्याला “ ह्योच त्यो” असेच समर्पक नाव ठेवले आहे.
वाटेवरच्या वाड्या, बहुतेक ठिकाणी आता पक्के रस्ते, विजेच्या तारा पोचलेले आहेत. गावाच्या मुख्य रस्त्याला
लागून बांधलेली वीस ते तीस कधी पन्नास घरे, घरासमोर असलेले नळ-पाणी योजनेचे नळ.
घरगुती व्यापाराच्या सप्लाय चेन मधील शेवटचे ठिकाण असलेली, घरातूनच चालवली जाणारी
प्रोविजन स्टोअर्स. या मोसमात खूप ट्रेकर्स इथून जातात म्हणून केलेली चहा, कॉफी ची सोय, कुठे
बिस्किटांचे पुडे आणि पूर्वी दिसणाऱ्या पाण्याच्या लखलखीत हंड्यांची जागा
घेतलेल्या बिसलेरीच्या बाटल्याचे क्रेट. “नळाचे पाणी भरून घेऊ का?” असे विचारल्यावर थोडेसे आश्चर्य दाखवणारी तिथली माय.
घरोघरी दारात किंवा परसात दिसणारे पॉवर टिलर आणि भात शेतीत चिखल करण्यासाठी
त्याच्या चाकांना लावलेले गोलाकार फाळ.
दैनंदिन गरजा पूर्ण होतील
इतकी उन्नती झालेली वस्ती, तरी अप्रूप म्हणून गावा गावातून जाताना गोळ्या- चोकलेट
हसत हसत मागणारी छोटीशी मुले, गेल्या वर्षी आमच्या मित्राने वही पेन्सिली दिल्या
तर नाखुशीने घेणारी! पाटेवाडीतल्या एका घराच्या भिंतीवर चितारलेले कोण्या एका सचिन
च्या शुभ विवाहाचे निमंत्रण. हा सचिन एकोणीस वर्षापूर्वी हा ट्रेक केला तेव्हा
असाच गोळी- चोकलेट मागायला आला असेल का? कसा असेल तो? आज काय करत असेल? दारात उभ्या
मोटरसायकल वरून आजच्या परिस्थितीचा अंदाज करू शकतो, पण मग पूर्वी
कसा असेल तो? कुठे आणि किती शिकला
असेल?
इतक्या दुर्गम गावात
पोचलेले रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या
योजना, विजेची व्यवस्था यासाठी झालेली गुंतवणूक पाहता अंत्योदय योजना महत्वाची
असली तरी तिला अधिक परिणामकारक आणि कमी गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध नसेल का असा
विचार एका मित्राने व्यक्त केला. आर्थिक निकषावर पाहिले तर खरे आहे पण त्याचे सामाजिक
परिणाम काय होतील याचाही विचार व्हायला हवा असा निष्कर्ष चर्चे अंती निघाला.
दैनंदिन गरजा कमी आणि उत्पन्न त्या भागविण्यासाठी पुरेसे असेल तर इतक्या
निसर्गरम्य वातावरणातले आयुष्य सुखाचे कि शहरातले मृगजळामागे धावणारे जीवन सुखाचे
असाही प्रश्न बोला चालीत निघाला. अर्थातच याचे उत्तर अनिर्णित राहिले.
एखाद्या शेताच्या
बांधावरून कसरत करीत जाताना समोरून आलेल्या एखाद्या मावशीने “ डोके दुखण्यावर गोळी
आहे का व्हो?” असा केलेला प्रश्न हा
दुर्गम भागात फिरताना येणारा नेहमीचा अनुभव. डोक्यावर इरले घालण्याआधी
बांधलेले चुंबळे, ऊन, वारा, पाऊस झेलून करपलेली काया, बैलांचे कासरे आणि हिरी
वरच्या रहाटाचे दोर ओढून घट्टे पडलेले हात, पायताणा वाचून
शेतात उतरून केलेल्या कामाने भेगा पडलेले पाय अश्या वेशातले त्या गावच्या
उतरण्डीतल्या अंतिम कडीतले शेत मजूर आणि
त्यांच्या बाया. आमच्याकडील काही खाद्य पदार्थ देण्यासाठी पिशवीतून बाहेर
काढल्यावर त्या खरखरीत हातांची ओंजळ करून समोर येणारा. मी देणारा आणि तो घेणारा हा
भाव सोडून त्याला बंधुत्वाने मिठी मारावी असा विचार क्षणात मनात आलेला, पण न जाणो
कशामुळे तो आवेग रोखून केवळ शब्दांचा आधार घेत आणि देत पुढे पाय चालविणारा
मी......
संपूर्ण ट्रेक मार्गावर
कुठेही उगाच लोळण घेणारा प्लास्टिक चा कचरा नाही. तो फक्त गावकीत. कुठे उगाच
स्वागताचे फलक नाहीत आणि कुठे डीजे किंवा गाडीत मोठ्याने गाणी लावून नाच गाणी
नाहीत. उत्साहाने चालणारी तरुणाई. मुद्दामहून हा अनुभव तरुणांना देणारे आयोजक. पावित्र्याने
भारलेले, छान छौकी सोडाच पण सामिष भोजन सुद्धा या वाटेवर नाकारणारे. एखाद्या
ध्येयाने तरुणाई प्रेरित असेल तर किमान काय होऊ शकते याचा अनुभव देणारे हे
निरीक्षण.
असा समृध्द अनुभव देणारी
हि पायपीट. गढूळ पाण्याचे डबके, वाहणारा पाट किंवा ओढा, चिखलाने माखलेला आणि भरलेला रस्ता, वरून कोसळणारा पाऊस, ओलेत्या भागात असू शकणाऱ्या रक्त
पिपासू जळवा याची काल्पनिक आणि वास्तविक भीती घालवून देणारी आणि शारीरिक क्षमतेची परीक्षा पाहणारी; पुन्हा
येण्याची साद घालणारी. म्हणूनच म्हणतो, मी पुन्हा जाईन, पुन्हा जाईन.....
सत्यजित चितळे
जुलै २०२५
#Panhala
#Pavankhind
#Vishalgad