Tuesday, June 16, 2026

विठ्ठला कॉलिंग २ - पुणे -पंढरपूर सायकल वारी


वर्ष २०२६, शके १९४८ अधिक मासाचे वर्ष आणि त्यात ज्येष्ठ महिना अधिकाचा.

गेल्या वर्षी सोलापूर रस्त्याने सायकल वारी केली, या वर्षी पालखी मार्गाने जायचे. मार्ग भिन्न परंतु पोहोचायचे ठिकाण एकच. कोणता मार्ग हे निवडायचा अधिकार माझा नव्हताच, मुक्काम मात्र निश्चित होता.

१३ जून २०२६, पहाटे २.४० चा गजर वाजला तो जाग आल्यापासून एक दीड तासाने. अर्थात झोप फक्त ३-३.१५ तास झालेली. आवरले, देवाच्या पाया पडून सायकल खाली उतरवली आणि मोबाइल वर स्ट्रावा अॅप सुरू करून सायकलवर टांग मारली.

नळ-स्टॉपच्या चौकात वैभव वाट पाहत होता. त्याच्या बरोबर ज्ञानेश देशमुख पाहून आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. येणाऱ्या १८-२० जणांपैकी ओळखीच्या आठ लोकात एकाची वाढच झाली. अर्थात ही दुककल ‘पुण्यात भेटली की नंतर थेट पंढरपूरात भेटणार’ अशी चेष्टेखोर टिपण्णी सार्थ करणारी होती. सारसबाग गणपती पाशी आणखीन एक ग्रुप भेटला. ते सोलापूर रस्त्याने जाऊन इंदापूर अकलूज  मार्गे येणार आहे असे कळले.

ठीक ४ वाजता प्रस्थान ठेवले. वाघोलीहून येणारी मंडळी हडपसर पाशी भेटली आणि पुढे फुरसूंगी पाशी २० चा चमू पूर्ण झाला. वडकी नाला ते फुरसूंगी रस्त्याचे काम चालूच असल्यामुळे मधूनच कच्च्या रस्त्यावर आणि कधी चिंचोळया सर्विस रोडवरून कसरत करत सायकल चालवावी लागत होती. दिवे घाटाच्या सुरुवातीला संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा विसावा आहे तिथून निरभ्र आकाशात पूर्वेला त्रयोदशीची चंद्रकोर मनोहारी दिसली.

दुरूनच दिवे घाटातली वाहतूक दिसत होती आणि त्यात लुकलुकणारे लाल दिवेही दिसत होते. या मार्गावर आज अजूनही सायकल स्वार आहेत म्हणजे! मनात विचार आला. एका दृष्टीने बरेच झाले.

घाट माथ्यावरच्या विठ्ठलाच्या मूर्तीचे मुख आणि चंद्रकोर यांची काही जुळवाजुळव होणारी जागा गाठली तर फोटो सुंदर येईल असे वाटून दिवे घाट चढायची सुरुवात जरा वेगातच केली. लांबून दिसलेल्या सायकल स्वरांना गाठले आणि मागे टाकत वीसेक मिनिटांत घाट माथा गाठला. सायकल लावून पायवाटेने वर गेलो खरा, परंतु दिशेचे ज्ञान आणि अंदाज खूपच चुकला. विठ्ठलाची मूर्ती आणि तिच्या माथ्यावर चंद्रकोर अशी मांडणी होण्यासारखी जागा तिथे नव्हती. तसेही चंद्रकोर शंकराच्या माथ्यावर शोभून दिसते ना! ईश्वर एकच असला तरी मानवी शरीर रूपात त्याला दिलेला दागिना आणि त्याच्या कथा त्याच्यापाशीच सुंदर दिसतात/ वाटतात हे खरे!

मग उगा थांबल्या जागी चंद्रकोर कॅमेऱ्यात बंदिस्त केली. थोड्याच वेळात सगळेच घाट चढून वर पावते झाले. मंदार मात्र मागे पडला होता. सासवड मध्ये शिवरायांच्या पुतळ्या जवळ चहा घेण्याचा बेत ठरला. उन्हाचा तडाखा सुरू होण्यापूर्वीच जास्तीत जास्त अंतर कापण्याचा वैभव आणि इतर मंडळींचा अनुभवी विचार बरोबरही होता. थोडा वेळ जास्त थांबलो, सासवड मध्ये भेटायचे ठरवून सगळे पुढे निघाले. मग मंदार आला. घाट चढायचे श्रम निववून आम्ही पुढे निघालो. आता पंढरपूर पर्यंत चांगला रुंद पालखी मार्ग सोडायचा नव्हता.

सासवड चा बायपास न घेता गावाच्या दिशेने निघालो तो डावीकडे पूर्वेला नारिंगी रंगाचे सूर्य बिंब क्षितिजावर आलेले दिसले. मोहक तरी दाहक. आजच्या दिवसाच्या काहिलीची वर्दी घेऊनच अरूणाने सूर्य देवाच्या रथाचे सारथ्य करायचे ठरवले असावे असा भास व्हावा, इतके दाहक.


सासवड मध्ये पोचलो तेव्हा उजाडले असले तरी गांव जागा झालेला नव्हता. गाव ओलांडले आणि हायवे धरताना उजवीकडील बाभळीच्या झाडवरून “पेरते व्हा” ची हाक ऐकू आली. आभाळात कोणत्याही दिशेला ढगांचा एक पुंजकाही दृष्टीस पडत नसताना हा बिचारा कोणता आशावाद पेरतो आहे असा प्रश्न मनाला चाटून गेला.

सासवड मागे पडत होते आणि उजवीकडील पुरंदर आणि वज्रगड माथा सुद्धा.  रस्ता माहितीचा, जास्त प्रमाणात उतार असलेला, सकाळची तुलनेने थंड हवा आणि माफक असलेले वारे यातून सायकल वेगाने मार्ग कापत होती. मग दुरून नऊ लाख पायऱ्यांचा खंडेरायाचा मल्हार गड दिसला. जेजूरी गांव लागले तेव्हा ६.३० वाजले होते. नाश्ता कुठे हा प्रश्न विचारायची वेळ नव्हती पण इथेच कुठे तरी थांबण्याचे नियोजन चेतन ने आधी पाठवले होते. “अ” तुकडीतल्या सर्वांनी मात्र ‘जास्तीत जास्त अंतर’ एव्हढा एकच मंत्र जपत सायकल मारायची ठरवली असावी. कोणी थांबलेले दिसेना.

जेजूरी एम आय डी सी मधून जाताना काही नवीन कारखाने पाहून चांगले वाटले आणि बरेचसे जुने, बंद पडलेले कारखाने आणि त्याच्या आवारात आणि भिंतीलगात वाढलेली बोरी बाभळी पाहून वाईट वाटले.

७.१० वाजता दौंडज पाशी मागून मंदार चा फोन आला. तो एकटाच मागे होता, थांबलो. सन रायडर्स ग्रुप चे मेंबर्स हसून अभिवादन करीत पुढे जात होते. ५-१० मिनिटातच मंदार तिथे पोचला. आपण दोघे गार्डचे डबे म्हणून जाऊ, अधिक अश्व(?)शक्तीच्या माणसांना त्यांच्या गतीने जाऊ द्या असे नियोजन करून दोघे पुढे निघालो. पोटात हळूहळू भुके ची जाणीव होऊ लागली होती. वाल्हे ओलांडले तेव्हा सूर्य चांगला कासरा भर वर आला होता अन डाव्या गालाला त्याची उष्णता जाणवू लागली होती. मग नीरेचे पात्र ओलांडले. या पात्रात पाऊस न पडताही भरपूर नीर होते ही पाहून दृष्टी सुखावली.

नवीन रस्त्याच्या बांधणीत “गांव तिथे फ्लाय ओव्हर” अशी योजना असल्यामुळे सारखेच क्रमा क्रमाने येणाऱ्या चढ आणि उतार याचा आत्ताच कंटाळा येऊ लागला. पिंपरे गावचा फ्लाय ओव्हर दिसला आणि धीर खचला, सर्विस रोड ने जाऊ असा विचार करून सायकल रेटली. पुलाच्या खालच्या क्रॉस रोड पर्यन्त सर्व्हिस रोड आहे, पुढे नाहीच. आता परत उलटे जाऊन फ्लाय ओव्हर चढावा लागणार! परंतु एका दृष्टीने बरेच झाले की सकाळीच हे ज्ञान मिळाले. पुढे येणार प्रत्येक फ्लाय ओव्हर आपली हीच परीक्षा घेऊ शकेल त्याचे हे उत्तर पहिल्यांदाच ठेच लागून मिळून गेले.

हा पूल ओलांडला आणि लोणंद फाट्या जवळ एका छोट्याश्या हॉटेल मध्ये थांबलो. एका कुटुंबाने चालवलेले छोटेसे उपहारगृह. सकाळी सकाळी उपलब्ध मेन्यूमध्ये भजी, चहा, लिंबू सरबत आणि मिसळ, इतकंच. आणि अर्थातच बर्फाळ म्हणावे इतके थंड झालेले बाटलीबांद पाणी. जवळचे पाणी संपले होते. म्हणून बाटली घेतली आणि दोन घोट घशात घातले तर “चर्र” असा आवाज कानात आतल्या आत ऐकू आला. जून मधल्या सकाळच्या “ कोवळ्या ?” उन्हात तापलेला चेहरा आणि घसा थंड पाण्याने एकदम आकुंचन पावला असावा. उष्मा घात टाळण्यासाठी ही कृती टाळली पाहिजे हे ज्ञान अनुभवसिद्ध प्राप्त झाले. चहा आणि बिस्किटे हाणली. थोडा जीवात जीव आला. आमचा चमू तेव्हा ९ किमी पुढे नाश्ता करत होता. त्यांना जेवायच्या वेळेस गाठायचा बेत करून निघालो.

वाटेत तरसवाडी चा बोर्ड दिसला. सासवड- जेजूरी-कर्हे पठार हे  माळरानावरच्या प्राण्यांचे माहेर घर. पुण्यातले ग्रास लँड ट्रस्ट त्यांच्या संवर्धनासाठी जीव तोडून काम करते आहे. माणसाच्या जगात या प्राण्यांच्या नावे कुलनामे आहेत, गावांच्या आणि वाडयाची नवे आहेत परंतु त्या प्राण्यांच्या नावे कोणतेही सात-बारा नाहीत. जागोजाग प्लॉटिंग करून लावलेले खूणे चे दगड आणि कंपाऊंड, कुठे त्या जमिनीच्या स्वामींची नावे. वाढत्या शहरीकरण आणि त्यातील सुबत्तेची ही लक्षणे.

अर्ध्या तासाने तरडगाव गाठून नाश्ता घेण्यासाठी थांबलो तेव्हा पुढच्या फळीतील शेवटचे खेळाडू नाश्ता संपवून निघत होते. पश्चिमेकडून येणाऱ्या तुरळक ढगांच्या पुंजक्यानी आमच्यावर छत्र धरायला सुरुवात केली होती. पुढचा प्रवास चांगला होईल असे वाटून गेले. इथल्या हॉटेल मध्ये कर्मचारी हिन्दी भाषिक आणि मेन्यू मध्ये फक्त मिसळच! आपल्याच पोटाचा विचार करत फक्त चहा वर समाधान मानले. एखादा व्यवसाय चांगला चालण्यासाठी खरी आवश्यक असते ती ग्राहकाविषयी आपुलकी. ती इथे फारशी दिसली नाही. ढगांनी तरी अशीच कृपा ठेवावी अशी इच्छा करीत पुढे निघालो.

ढगांचा पुंजका सूर्य आणि आमच्यामध्ये येऊन सावली पाडत होता. अगदी गडद नव्हे परंतु पायाकडे सरकू लागलेल्या आपल्या सावलीच्या कडा अस्पष्ट होण्याइतका तरी दिलासा त्याने मिळत असे. वाऱ्याचीही काही काळ कमाल झाली. आमच्या वेगा बरहुकूम तो ढगाला बरोबर आमच्या माथ्यावर ठेवू लागला. परमेश्वराचीच कृपा असा विचार येऊन मन सुखावले. परंतु हे सुख फार काळ उपभोगायचे नव्हते. मग ढगाची सावली पुढे निघाली आणि आपली सावली अधिक गडद आणि स्पष्ट दिसू लागली. ढगाची छाया गाठायचा प्रयत्न करावा तर ती अधिक पुढे पळे. दूरवर लांबणाऱ्या रस्त्यावरच्या खळग्यात ढगाची सावली दिसे. तिथे पोहोचे तोवर कडक ऊन. आपल्याला दिसले ते मृगजळ की काय असा विचार यावा. काय गंमत आहे, तहानलेल्या मृगाला जळाच्या ओढीने दिसते तसेच आसुसलेल्या मनाला सावलीचेही मृगजळ दिसावे! जमिनीवरचे नसलेले जल आणि ढगातल्या खऱ्या बाष्पयुक्त जलाने साधलेला आभासी परिणाम!

फलटण ओलांडले तेव्हा साडे दहाचा सुमार झाला होता. ढगांनी सूर्याबरोबरच्या लपाछपी च्या खेळातून पूर्ण माघार घेतली होती आणि पश्चिमेच्या क्षितिजावर रेंगाळणारे ढग थिजल्यासारखे दिसत होते. बाकी आकाशाचे पूर्ण निरभ्र मैदान तळपत्या सूर्यास आंदण दिलेले आणि तो पूर्ण ताकदीने आग ओकत होता. पाठीवरच्या कप्प्यात ठेवलेल्या मोबाइल वर हरिपाठ चा ऑडियो सुरू केला. गेल्यावर्षीच तो ऐकून पाठ करण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता. बाजूने वेगाने आवाज करत जाणाऱ्या वाहनांच्या आवाजा पुढे मोबाइल च्या स्पीकरची ताकद कमी पडत असली, तरी काही ओळखीचे शब्द आणि टाळाचा नाद मात्र ऐकू येत होता. त्याची लय आणि पेडल मारताना होणाऱ्या पायांच्या हालचालीची लय जुळवली आणि मग प्रवास हलका होऊ लागला. कोणाच्याही साथीने का असेना अजच्यापुरती जीवनाची लय गवसली होती.

उन्हाने तप्त झालेल्या रस्त्यावर सलग अर्धा तास घरंगळत गेल्यावर टायरच्या घर्षणाचा आवाज होई. मग रस्त्याच्या कडेला मारलेल्या पांढऱ्या पट्ट्या वरुन सायकल चालवायचा प्रयत्न करायचा. वाहनांच्या टायरसाठी बनविलेल्या रस्त्याच्या पृष्ठभागाचा विरोध थोडा तरी कमी होई. परंतु सलग तसे चालवणे म्हणजे चांगलीच कसरत होती.  

आधी छत्र धरणारे ढग आणि नंतर माथ्यावर आग ओकणारा  सूर्य हे दोघे “हरी” च, त्यांना शरण गेलो की कशाचे काही वाटत नाही हा गेल्या वर्षीचा अनुभव पुन्हा घेतला. शरीर धर्माला आवश्यक तितके पाणी, ईलेक्ट्रॉल आणि जीवनसत्वे घेत राहिले म्हणजे तो धर्म टिकतो, बाकी काही करावे लागत नाही. तोंडावाटे घेतलेले पाणी काही कळायच्या आत थेट बाष्प रूपात जाताना जाणवावे असा उन्हाचा तडाखा शरीराला बसत होता परंतु मन मात्र त्याकडे आनंदानेच पाहत होते.

नातेपुते गावचा बाय पास हा दूर दृष्टीने गावाच्या खूप बाहेरून काढलेला रस्ता. दूर दृष्टी अश्यासाठी की कितीही दूर दृष्टी नेली तरी गाव काही दिसेना. मध्यानहीच्या उन्हात धापा टाकीत तिथून चढून जाताना सावलीसाठी जेमतेम एक पडकी टपरी मिळाली. तिथे थांबून पाण्याचे घोट घेताना दूरवर शेळ्या चरायला घेऊन जाणारी एक गावकरी महिला दिसली. तिला या ऊष्म्याचे काही सोयरसुतक नसावे. झाडाचे बीज मनस्वी जिथे रुजते ती माती आणि तिथले जलवायू त्या बीजाला अभय प्राप्त करून देत असावेत.

नातेपुते ओलांडताना वैभवशी संपर्क झाला आणि जेवण माळशिरस पाशी घेण्याचे ठरले असल्याचे कळले. बाकीची टीम आता आमच्या पुढे जवळ पास १६- १७ किमी वर होती, म्हणजे सुमारे पाऊण तासावर. पोटात कावळे कोकलत होतेच. मग रणरणत्या उन्हात सायकल दामटली. “दामटणे” या क्रियापदाची एक वेगळीच छटा आहे नाही का! पूर्वी जेव्हा वाहन म्हणून प्राणी वापरले जात असत तेव्हा माणूस कर्ता, आणि कर्म किंवा खरे तर ऑब्जेक्ट हा तो प्राणी असे आणि त्या प्राण्याची मन:स्थिती या क्रिया पदावरून समजून येत असे. सायकल दामटणे यातील सायकल ही मुळात निर्जीव घटक, म्हणजे ती दामटणारा मी आणि दामटून घेणाराही मीच असे होते नव्हे काय! हा विचार आला आणि मन आणि बुद्धी या एकदम वेगळ्या झाल्या. त्यांचे द्वैत समोर आले आणि भांडण जुंपले. शरीर, ज्याची स्वामिनी बुद्धी, ती या सगळ्या वेडेपणाच्या विरोधात उभी ठाकली. तशी ती दहा दिवस आधी डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी गेलो आणि तो न मिळाल्यावरही इथे येण्याच्या निर्णय घेतला तेव्हा पासूनच विरोधात होती. परंतु मनाने ठरविले आणि त्याने तिचे काही एक ऐकून घेतले नव्हते. मित्र मागे पडतोय तर काय करावे? सपोर्ट वाहनात बसून पुढे जावे की जमेल तसे जात राहावे? राईड सोडावी तर पहाटे दिसलेली भारद्वाज पक्ष्यांची जोडी काय सुचवित होती? तो “पेरते व्हा” कोणता आशावाद सांगत होता?  या आणि अश्या असंख्य प्रश्नांनी मनाच्या पटलावर एक गुंता तयार केला होता.

दीनानाथ रुग्णालयात रांगेत उभे असता, स्व. माई मंगेशकर यांच्या पुतळ्या खाली कोरलेली “मोगरा फुलला” या अभंगातील एक ओळ आठवली. “मनाचिये गुंती गुंफियला शेला, बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू अर्पियेला।”  ज्यांना आत्मतत्व उमगले आणि त्याचा साक्षात्कार झाला त्या माऊलींच्या मनात सुद्धा विचारांचा गुंता असावा तर आपली काय कथा. परंतु त्यांच्या मनातील दिव्य विचारांनी गुंफलेला तो भरजरी शेला किती तलम, किती पवित्र असेल! आणि तोही ते विठ्ठलाच्या चरणी अर्पित करतात. आपल्या मनातील गुंता..... नव्हे गुंतवळ आणि त्याचा गुंफलेला शेला मात्र सतत “मी, माझे....” या विचाराभोवती घुटमळून भरड झालेला, मळलेला. कसेही असले तरी तो त्याच्या चरणी अर्पावा हेच  खरे.

माळशिरस च्या हॉटेल आकाशपाशी पोचलो तेव्हा दुपारचे दोन वाजले होते. आमच्या चमुतले सगळेच भरपेट जेवून हास्यविनोद करीत आराम करत होते. सपाटून लागलेल्या क्षुधेस शांत करे पर्यन्त त्यांची विश्रांतीची वेळ संपली आणि पंढरपूरात भेटू असे म्हणून सगळे पुढे निघाले. मग आमची विश्रांतीची वेळ सुरू झाली. हॉटेल मधल्या कर्मचार्यांशी जुजबी संवाद साधत आराम केला आणि ३.१५ वाजता पुढील प्रवासास सुरुवात केली. अर्धा तास पेडल मारायचे आणि ५-१० मिनिटे ब्रेक घ्यायचा असे करत वेळापूर ४.१५ च्या सुमारास गाठले. इथले पुरातन मंदीर लांबूनच बघितले आणि तिथे एकदा यायचे ठरवीत पुढे निघालो. वेळापूर ते वाखरी रस्ता सौम्य चढाचा आहे. सूर्य झपाट्याने पश्चिम क्षितिजाकडे सरकू लागला होता आणि आमच्या आधीच आमच्या सावल्या पंढरपूरची वेस गाठणार असे वाटू लागले. ६ वाजता पंढरपूर फाट्यावर थांबलो. कोवळ्या वयातील दोन किशोर वयीन मुलांनी परग्रहावरील  माणूस पहावा तसे पाहत प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांचे समाधान करतो तोवर मंदार येऊन पोहोचला. इथून पुढे गावातली रहदारी लागणार म्हणून बरोबर जायचे ठरवले. गावात शिरलो, रस्ते संध्याकाळी कोणत्याही गावात असावे तसे तुडुंब भरलेले. गुगल च्या तंत्रज्ञानाने उपकृत होत भक्त निवास गाठला तेव्हा संध्याकाळचे ६.४५ वाजले होते. मोबाइलवर घरापासून २१३.५० किमी झालेले दाखवत होते आणि एक छान समाधान वाटत होते.

भक्त निवासात स्थिर स्थावर होऊन मंदिरा जवळच्या रेणुका भोजनालयात साधेच परंतु चविष्ट जेवण घेतले आणि उकाडा भरलेल्या रात्री स्नान करून बिछान्यावर अंग टाकले. उकाड्यामुळे झोप काही नीट लागेना, आणि त्यातून आता स्नायू सुद्धा व्यथा मांडू लागलेले.

पहाटे २.३० चा गजर झाला. आवरून खाली गेलो. पुण्याकडे सायकल वरुन परतणारे चमूतील १५ जवान तयार झाले होते. त्यांच्या खोल्यांच्या किल्ल्या घेऊन परत खोलीत येऊन एक दीड तास झोप काढली. मग उठून आवरून आणि सर्व खोल्या चेक आऊट करून मंदिराची वाट धरली.

अधिक मासाचा शेवटचा दिवस आणि त्यात रविवार असल्यामुळे तिथे भाउगर्दी उसळली होती. संत नामदेवांच्या पायरीचे दर्शन घेऊन बस स्टँड गाठला. ७ वाजताच्या शिवाई बस चे आरक्षण मंदार ने आदल्या दिवशीच करवून घेतले होते. बस चक्क वेळेत आली आणि वेळेत सुटली.

मागच्या सीटवर काही भाविक बसलेले होते. त्यातील महिला भजने आणि कवने म्हणत होत्या. हरिपाठ त्यांनी अर्धी अर्धी ओळ वाटून घेत पूर्ण म्हणला. तो वेगळ्या चालीत होता आणि कोणत्याही तालाविना तरीही कानाला गोड वाटला. आदल्या दिवशीचे श्रम आणि रात्री न झालेली झोप यामुळे हरिपाठ ऐकता ऐकताच झोप लागली.... हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी॥

पूर्वचरण:

गेल्या वर्षी आयएएस बरोबर आयुष्यातील पहीला पंढरपूर मुक्काम आणि तोही सायकलवर गाठून केल्यावर याही वर्षी पुन्हा सायकल वारी करण्याचे मनात ठरवून टाकले होते. आषाढी वारीचे वेळापत्रक येण्यापूर्वीच सह्याद्री सायकलिंग ग्रुप वर वारीचा निरोप फिरला आणि होकार देऊन टाकला.

वारीचे उत्कृष्ट नियोजन चेतन कोठवदे ने केले. त्याला अनेक राईड चा अनुभव असल्यामुळे तो म्हणेल ते प्रमाण मानायला काहीच हरकत नव्हती.  

सरावाला निज ज्येष्ठ पुरणार नव्हताच! कारण अधिक ज्येष्ठामुळे वारीची १३ जून ही तारीख लांबच आहे असा आभास निर्माण झालेला. ग्रुपवर सरावाच्या सफरींचे निरोपही फारसे येत नव्हते आणि आले तरी मी तिथे जात नव्हतो! पाठीच्या दुखण्यामुळे काही महीने धक्के बसण्याच्या व्यायामपासून फारकत घेतलेले शरीर चांगलेच लाडावलेले. डॉक्टरांच्या भेटीने त्याला पुन्हा धावण्याचा व्यायाम करण्याची ऊर्जा मिळाली परंतु पहिल्या महिन्यात धावताना काहीतरी बिनसले आणि उजव्या गुढग्याने मनाच्या या मनमानी विरुद्ध बंड पुकारले. एका आठवड्याने पोटाने दोन दिवसासाठी अचानक असहकार पुकारला. या वर्षी सायकल वारी चुकणार की काय अशी वेळ वारी दहा दिवसावर आली तेव्हा येऊन ठेपली.

सायकल चालवताना पायाला धक्के बसत नाहीत त्यामुळे असे आजार फारसे त्रास देत नाहीत असे “तज्ञ” मित्रांचे म्हणणे होते. तरीही एकदा डॉक्टरांना दाखवून यावे म्हणून दीनानाथ मंगेशकर मध्ये गुरुवारी सकाळी दाखल झालो. डॉक्टर मोने यांचा गुरुवारी फक्त ८० पेशंट तपासण्याचा दंडक माहीत असूनही उशीर झाला आणि माझा नंबर ९० वा लागला. या बाबतीत काठावरही पास न झाल्याने विचारून कृती करण्याचा काठ सोडला आणि सायकल सफरीच्या प्रवाहात झोकून द्यायचे ठरवले.

मित्र मंदार बरोबर तीन चार छोट्या सायकल सफरी केल्या तितकाच के तो सराव. या सर्व सराव फेऱ्याची एकूण बेरीज सुद्धा २२० किमी भरली नाही!

१३ जून शनिवारी निघायचे, पहाटे ४ वाजता सारसबाग स्टारटिंग पॉइंट, नेहमीप्रमाणे. १२ जून, शुक्रवार, कंपनीतील कामे संपविण्याच्या इर्षेने काम सुरू केले. दुपारचे जेवण पोटात गेले आणि पोटाने संपाची नोटिस जारी केली. संपले, उद्याची राईड आता फक्त स्वप्नातच असे वाटले, परंतु क्षणैकच.  थोडेसे आयुर्वेदिक औषध ढकलले आणि तयारी करून निद्रेच्या स्वाधीन झालो. प्रत्यक्ष वारीत मग काही अडचण आली नाही.

प्रत्येकाला ठरवलेला बेत तडीस नेण्याच्या आधी आणि प्रत्यक्ष तो बेत तडीस नेताना अडचणी येतातच. आपली आपल्या निर्णयावर श्रद्धा किती आहे त्यावर त्या त्या अडचणींवर मात कशी होते ते अवलंबून आहे, कदाचित तीच परमेश्वरावरची खरी श्रद्धा आहे!

सत्यजित चितळे

पंढरपूर सायकल वारी, १३ जून २०२६

No comments:

Post a Comment